प्रभावी व्यक्तिमत्व हरपले   

वरुण भालेराव प्रसिद्ध शास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर सर्वांप्रमाणेच माझ्यासाठीही रोल मॉडेल होते. किंबहुना मी खगोलशास्त्रामध्ये कार्यरत होण्यामागील प्रेरणास्थान असणारे हे नाव होते, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यांनी ‘आयुका’ची स्थापना केली तेव्हा आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याकडे लक्ष देण्याचेही ठरवले. म्हणजे या संस्थेत महत्त्वपूर्ण संशोधन करायचे, त्यासाठी लोकांना तिथे आणायचेच; पण त्याचबरोबर सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठीही धोरणे राबवायची हे धोरण आधीपासूनच निश्चित होते. ‘आयुका’च्या ध्येयाचा तो एक भाग होता. त्यामुळे या मार्गानेही संस्था मोठे काम करु शकली. संस्थेबरोबरच त्यांनी स्वत:च्या विज्ञानविषयक लेखनातून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मराठीमध्ये अनेक लेख, गोष्टी लिहिल्या. या सगळ्यामुळे पुण्यामध्ये ‘आयुका’च्या उपक्रमांची नेहमीच मोठी चर्चा असायची. विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने असायची, उन्हाळी सुट्टीमध्ये काही खास उपक्रमांची आखणी असायची. अशा कार्यक्रमांमधून एवढा महान शास्त्रज्ञ तुमच्यापुढे येतो, त्याला प्रत्यक्ष बघता येते तेव्हा विलक्षण प्रभाव पडणे स्वाभाविक असते, मी तेच अनुभवले.
 
‘आयुका’च्या उपक्रमांमधूनच मी खगोलशास्त्रात पहिले पाऊल ठेवले. या क्षेत्रात माझी आवड निर्माण झाली आणि आज मी या क्षेत्रात कार्यरत आहे. अर्थातच डॉ. नारळीकरांमुळे, त्यांच्या कामाच्या प्रभावानेच हे घडू शकले, यात शंका नाही. केवळ मीच नव्हे तर माझ्यासारखे अनेक जण त्यांच्यापासून प्रेरणा घेत इथे आले आहेत. खगोलशास्त्राचा विचार केला तर आज भारताची जगात प्रतिमा निर्माण करण्यातही नारळीकर आणि त्यांच्या पिढीतील अन्य तज्ज्ञांचा मोलाचा सहभाग मान्य करावा लागेल. त्यांनी देशाला या क्षेत्राची विशेष ओळख मिळवून दिलीच, खेरीज नवीन पिढीपर्यंत अत्यंत प्रभावीपणे वैज्ञानिक विचार पोहोचवले. भारताच्या उंचावलेल्या प्रतिमेमागे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
 
डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वउत्पत्तीशास्त्र आणि विश्वउत्क्रांतीमध्ये प्रचंड काम केले. यातील त्यांचे योगदान वादातीत आहे. त्याचबरोबर स्टेडी स्टेट थिअरीवरही त्यांनी मोठे काम केले. या थिअरीने त्यांना जगभर ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मी ‘आयुका’त कार्यरत झालो तेव्हा ते निवृत्त झाले नव्हते. मात्र मी त्यांच्या विषयात काम करत नसल्यामुळे चर्चा करण्याची, एकत्र काम करण्याची संधी कधी मिळाली नाही; मात्र माझ्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विलक्षण प्रभाव आहे, हे नाकारुन चालणार नाही. कारकिर्दीत उत्तुंग उंची गाठूनही जमिनीलगत राहणारा माणूस... असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.
साधी राहणी
 
त्यांच्या साध्या राहणीचे, प्रगाढ बुद्धिमत्तेचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. ओळखच इतकी मोठी होती की, देशात कोठेही त्यांना सहज प्रवेश होता. मानाचे स्थान होते; पण वैयक्तिक पातळीवर त्यांनी या गोष्टीचा कधीच लाभ उठवला नाही. इतकेच काय पण कोणी समोर आले, तर नमस्कार करत ते ‘मी जयंत नारळीकर’ अशी अत्यंत मृदू भाषेत आपली ओळख सांगायचे. अपरिचित व्यक्तीशी संभाषणाची सुरूवात याच वाक्यानिशी असायची. त्यांचे हे एक वाक्य समोरच्या कोणत्याही वयाच्या माणसाला आपलेसे करायचे. या वाक्याने त्याच्यावरील ताण नाहीसा व्हायचा आणि संवाद सहजी घडायचा. स्वभाव इतका सौम्य आणि सौहार्दपूर्ण असल्यामुळेच शाळकरी मुलेही त्यांच्याशी सहज बोलू शकायची. शंका विचारु शकायची. आजच्या भाषेत बोलायचे तर त्यांनी कधीच अ‍ॅटिट्युड दाखवला नाही. दांडगा जनसंपर्क असण्यामागील हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. ते कोणत्याही विषयावर बोलायला तयार असायचे. विशेष म्हणजे प्रत्येक विषयात बोलण्यासाठी त्यांच्याकडे अनेक संदर्भ आणि महत्त्वपूर्ण मुद्दे असायचे. त्यामुळेच त्यांचे बोलणे अत्यंत प्रभावी व्हायचे.
 
आजही ‘आयुका’ ही संस्था जयंत नारळीकर या नावाच्या प्रभावाखाली आहे. त्यांनी तिथे संशोधनाला पूरक ठरणारे वातावरण तयार केले. याचा प्रभाव तेथे येणार्‍या माझ्यासारख्या प्रत्येकाला जाणवतो. एखाद्या शास्त्रज्ञाने इतर विषयातही मोठे योगदान देणे, साहित्यनिर्मिती करुन जनसामान्यांवर आपले विचार पोहोचवणे, देशाला वैद्यानिक प्रगतीच्या दिशेकडे नेणे हे कामही त्यांनी अत्यंत सहजतेने केले. खगोलशास्त्रातील त्यांचे योगदान याच्या पलीकडे आहेच; पण आयुकासारखी संस्था, वैद्यानिकांची पुढील पिढी घडवण्याचे कामही आभाळाच्या उंचीचे आहे. त्यांनी हे काम केले नसते तर आज आपण वेगळ्या ठिकाणी असतो.
 

Related Articles